मुंबई:सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय तपासाच्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रथमच भाष्य केलं. 'सीबीआय चौकशीला माझा विरोध नाही. पण महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना मी गेली ५० वर्षे ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे,' असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला जवळपास दोन महिने उलटून गेल्यानंतरही त्याबाबतची चर्चा सुरूच आहे. विरोधी पक्ष भाजपने सीबीआय चौकशीची मागणी लावून धरल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. दोन्ही बाजूंनी या अनुषंगाने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवार यांनी आतापर्यंत यावर कुठलंही भाष्य केलं नव्हतं. मात्र, पार्थ पवार यांनी सुशांतच्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास असल्याचं सांगितलं. 'कोणी कोणावर काय आरोप केले, याच्या खोलात मला जायचे नाही. माझ्यासाठी ते फार महत्त्वाचे नाही. आत्महत्येची घटना ही दु:खदायकच आहे. मात्र, ज्या पद्धतीनं त्याची चर्चा होते ते आश्चर्यकारक आहे,' असं पवार म्हणाले.
सुशांत प्रकरणाच्या अनावश्यक चर्चेबद्दल खंत व्यक्त करताना पवारांनी साताऱ्यातील एक प्रसंगही सांगितला. साताऱ्यात असताना एका शेतकऱ्यानं मला याबद्दल विचारल्याचं पवार म्हणाले. 'कलाकारानं आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. ते व्हायला नको होतं. पण त्याची किती चर्चा मीडियात आहे. आमच्याकडच्या २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्याची नोंदही मीडियानं घेतली नाही,' असं तो शेतकरी म्हणाला. त्यावरून सर्वसामान्यांना काय वाटतं हे मला कळलं,' असं पवारांनी सांगितलं.
सुशांत प्रकरणाची चर्चा घडवून आणण्यामागे ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव आहे का असं विचारलं असता, 'या सगळ्यामागे कोणाचा नेमका काय हेतू आहे याची मला कल्पना नाही,' असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
मुंबई पोलिसांना ५० वर्षे ओळखतो, माझा पूर्ण विश्वास आहे: शरद पवार