मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात रेल्वेमार्ग पाण्याखाली जाऊन मध्य रेल्वेची सेवा ठप्प होते. यामुळे मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होत असते. मात्र रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती व आवश्यक मदत मुंबईकरांना तातडीने मिळणे गरजेचे असते. त्यामुळे या कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मध्य रेल्वे, पोलीस, बेस्ट, हवामान खाते यांची विशेष बैठक बोलावली होती. त्यानुसार अतिवृष्टीच्या काळात पालिका, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रेल्वे यांना सतर्क होण्यासाठी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा किमान २४ तास आधी द्यावा, असे निर्देश हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांना या बैठकीत देण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाले आणि रेल्वे मार्गावरील कल्व्हर्ट साफ करण्यात येतात. तरीही पावसाळ्यात पाणी तुंबून रेल्वे सेवा विस्कळीत होत असते. पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा आयुक्तांनी शुक्रवारी घेतला. या वेळी पावसाळ्याच्या काळात होणाऱ्या विलंबाबद्दल रेल्वेने आपत्ती व्यवस्थापन कक्षाला नियमितपणे तातडीने माहिती देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पूर्वकल्पना मिळाल्यास गरजेनुसार बेस्ट उपक्रम जादा बसगाड्यांची सोय स्थानकाबाहेर करू शकेल.
वाहतूक अधिक काळासाठी ठप्प झाल्यास पालिकेच्या निवारा केंद्रांत प्रवाशांना हलविणे, त्यासाठी प्रवाशांकडून नाममात्र पाच रुपये भाडे घेऊन त्यांना पालिकेच्या निवारा केंद्रात हलवावे, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. अनेक ठिकाणी या पर्जन्य जलवाहिन्या रेल्वेमार्गाखालून जातात. पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा, यासाठी पालिकेमार्फत उपाययोजना गेल्या काही वर्षांपासून रेल्वे हद्दीत सुरू आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी तत्काळ करून घेण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या प्रमुख अभियंत्यांनी रेल्वे प्रशासनाच्या संपर्कात राहावे. रेल्वे ट्रॅकखालील कल्व्हर्टस, नालेसफाई, नाले रुंदीकरण यांसारख्या कामासाठी पालिकेकडून रेल्वेला देय असलेला निधी तातडीने दिला जाईल, याची खात्री करून घ्यावी. शिवाय या कामाची वेळोवेळी पाहणी ड्रोन कॅ मेऱ्यांच्या मदतीने करता येऊ शकेल का? याची शक्यता पडताळून पाहावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
'उपनगरातील डॉपर कार्यरत करा'
सध्या कुलाबा येथे एक डॉपुर रडार कार्यरत आहे. वेरावली, अंधेरी येथे दुसऱ्या डॉपुर रडारसाठी हवामान खात्याला यापूर्वीच महापालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे हे दुसरे डॉ पुर रडार कुठल्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी कायान्वित करावेअसेही निर्देश हवामान खात्याला देण्यात आले.